अनुभव – गौरव कदम
बऱ्याच दिवसांनी मी आणि माझे 5 मित्र नाईट आउट साठी मित्राच्या घरी आलो होतो. संपूर्ण रात्र जागून एन्जॉय करणार होतो. मित्राच्या घरी जेवण वैगरे करून 12.30 च्या सुमारास घरा बाहेर पडलो. आम्हाला असे रात्री अपरात्री बाहेर फिरायची सवय होती. आम्ही मित्राच्या घरा जवळच फेर फटका मारत होतो. एका मित्राला फोन आला म्हणून तो फोन वर बोलण्यात मग्न झाला. इथे आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. बऱ्याच वेळा नंतर मला लक्षात आले की फोन वर बोलत असलेला मित्र कुठे दिसत नाहीये. बहुतेक बोलत बोलत बराच लांब गेला असावा म्हणून आम्ही फोन करून पहिला. पण त्याचा फोन नॉट रीचेबल लागत होता. काही वेळ वाट पाहिल्यावर आम्ही त्याला शोधायला निघालो.
तिथला सगळा परिसर पिंजून काढला पण तो मित्र कुठे दिसला नाही. एव्हाना दीड वाजत आला होता. आता फक्त एकच जागा बाकी होती. पाराकडची गल्ली. पण त्या गल्लीतून जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती. कारण त्या बद्दल बऱ्याच गोष्टी ऐकून होतो. काय तर म्हणे तिथे एका बाईच्या आत्म्याचा फेरा आहे. तिथे राहणाऱ्या लोकांना रोज रात्री कोणी तरी चालत असल्याचा, पैंजणाचा आवाज ऐकू येतो. मित्राचा पत्ता लागत नाही तो पर्यंत हातावर हात धरून बसणाऱ्यातले आम्ही नक्कीच नव्हतो. म्हणून हिम्मत करून त्या गल्लीकडे जायला निघालो. आमच्यातला एक जण खूप घाबरत होता आणि त्याला धीर द्यायला मी म्हणालो “ अरे आपण 6 जण आहोत.. चल काही नाही होत. “
त्या भागात पोहोचलो तसे माझ्या पुढे चालणाऱ्या एकाला आणि मला समोर कोणी तरी उभ असल्याच दिसलं. पांढऱ्या रंगाचं शर्ट भासत होतं. मी लगेच म्हणालो “ हा बघ याला गावभर शोधलं आणि हा इथे येऊन उभा आहे.. “ माझ्या त्या मित्राने हीं पांढरे शर्ट घातले होते. त्यामुळे उजेड कमी असला तरी ते पटकन नजरेस पडत होतं. आम्ही त्याच्या दिशेने चालू लागलो तसे तो आमच्या पासून दूर जातं असल्या सारखं वाटू लागलं. मी त्याला एक दोनदा हाक मारली पण तो आमच्या पासून विरुद्ध दिशेला जात होता.
काही वेळ चालल्या नंतर जसे तो गल्लीच्या टोकाला पोहोचला तसे आमच्या डोळ्यांदेखत नाहीसा झाला. आम्हा सगळ्यांची पावलं भीती न जागीच खिळली. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले “काय होतं हे.. “. आम्ही तसेच वळलो आणि धावातच त्या गल्लीतून बाहेर पडू लागलो. थेट मित्राच्या घरी आलो. तर ज्याला आम्ही शोधायला बाहेर पडलो होतो तोच मित्र आमच्या आधी घरी येउन बसला होता. आम्हाला पाहून त्यानं विचारलं “काय झालं.. कुठे गेला होतात..” पण आम्ही मात्र पूर्णतः निशब्द झालो होतो.