अनुभव – आदित्य

मी मुंबईत वास्तव्यास आहे, पण माझ्या आईचं मूळ गाव कोकणात होतं. लहानपणापासून गावाच्या भूताखेतांच्या गोष्टी ऐकून मोठा झालो, पण त्या केवळ कल्पना आहेत असंच वाटायचं. पण एक अनुभव… जो अजूनही माझ्या मनात ठळक आहे. तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. त्या वर्षी दिवाळीला मी आजोळी गेलो होतो. गाव एकदम सुंदर, निसर्गरम्य, पण तिथे एक विचित्र शांतता जाणवायची. दिवस उजाडला की सगळं ठीक वाटायचं, पण सूर्य मावळला की वातावरण काहीसं बदलायचं. जुन्या वाड्यांचे पडके दरवाजे, नारळाच्या झाडांचा वारा, आणि जळत्या समईचा मंद प्रकाश… एक भेसूर वातावरण तयार व्हायचं.गावात एक आख्यायिका सांगितली जायची – “मासळी बाई” नावाच्या स्त्रीबद्दल. लोक म्हणायचे, रात्री जर कोणी एकटं असेल, तर ही बाई त्याला शोधत फिरते. कोणाच्या पाठीमागे हलकेच चालत राहते आणि मागे वळून पाहिलं की त्याला झापटते.

त्या रात्री मी आणि माझे मित्र, समीर आणि रोहन, गावाबाहेरच्या जुन्या विहिरीपाशी गेलो होतो. समीरला हे सगळं फारसा मान्य नव्हतं. “असल्या गोष्टी नुसत्या उगाच पसरवल्या जातात,” असं त्याच मत असायच. आम्ही तिथे काही वेळ बसून गप्पा मारत होतो, पण लवकरच जाणवलं की सगळीकडे एकदम शांतता पसरली आहे. वारा थांबला आहे. आणि अचानक कुत्र्यांनी एकसारखं भुंकायला सुरुवात केली. तेव्हाच… आम्हाला मागून चपला ओढत चालल्याचा आवाज ऐकू आला. कोणीच काही बोललं नाही. आमच्या छातीत धडधड होत होती. मी रोहनकडे पाहिलं – तोही घाबरलेला दिसत होता. आम्ही काही क्षण तस्सेच स्तब्ध उभे होतो. आणि मग समीर अचानक ओरडला, “कोण आहे तिथे?!” क्षणात वातावरण बदललं. समीरच्या आवाजाने ते चालण्याचे आवाज थांबले, पण एक वेगळाच आवाज होऊ लागला. जणू काही कोणी आमच्या अगदी जवळ उभं होतं, पण दिसत नव्हतं. “चला इथून!” मी ओरडलो.

आम्ही धावत सुटलो. पायाखालील माती उडत होती, घसा कोरडा पडला होता. पण आम्ही जितक्या वेगाने पळत होतो, तितकंच जाणवत होतं की कोणी तरी आमच्या मागे आहे. एक क्षण, फक्त एक क्षण, मी मागे वळून पाहिलं… ते जे पाहिलं, ते आजही स्वप्नात येतं. त्या काळोख्या वाटेवर, एक आठ साडे आठ फूट उंच सावली उभी होती. पण ती हलत नव्हती. !आदित्य!” रोहनने माझा हात धरला आणि मला जोरात पुढे ओढलं. आम्ही शेवटी गावाच्या हद्दीत पोहोचलो, आणि सुटकेचा निश्वास सोडला. त्या रात्रीनंतर समीर आजारी पडला. त्याने सांगितलं की त्याला रोज रात्री तीच सावली स्वप्नात दिसायची. काही आठवड्यांतच त्याच्या घरच्यांनी त्याला दुसऱ्या गावी पाठवलं. मी मात्र, त्या रात्रीचा विचार अजूनही करतो. खरंच ते फक्त मनाचं खेळ होतं? की गावकऱ्यांनी सांगितलेल्या आख्यायिकेमध्ये काहीतरी सत्य होतं? आजही, जेव्हा मी एका शांत गडद रस्त्यावर चालतो… मला मागून चपला ओढत येणारा आवाज ऐकू येतो..

Leave a Reply