अनुभव – सागर

मी नुकताच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता. नवीन जागा, नवीन मित्र, नवीन स्वप्नं! हॉस्टेलमध्ये राहायला मिळालं, आणि मला स्वप्नील आणि विकी हे दोन रूममेट्स मिळाले. आम्हाला खोली क्रमांक १७ दिली गेली. पहिल्या काही दिवसांत सगळं ठीक होतं. पण हळूहळू आम्हाला जाणवू लागलं की… या खोलीत काहीतरी बरोबर नाही. प्रत्येक रात्री, जसा अंधार दाटायचा, तशी एक विचित्र जाणीव मनात दाटून यायची. जणू काही कोणी आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे. त्या रात्री मी गॅलरीत उभा होतो. अंधारलेलं वातावरण, थंडगार वारा, आणि हॉस्टेलचा जुना, भयावह कोपरा. मी फोनवर बोलत होतो, पण मन कुठेतरी अस्वस्थ होतं.

आणि मग…

खर्रर्र… खर्रर्र…

खोलीच्या आत काहीतरी सरकत होतं! म्हणजे वस्तू नाही जणू एखादा व्यक्ती.. त्याच्या कपडे जमिनीवर घासत होते. वातावरण एकदम शांत असल्याने तो आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. 

मी सावध झालो. हळूहळू खोलीकडे पाहिलं. पण जस मी पाहिलं तसं आवाज थांबला. 

“स्वप्नील? विकी?” मी आवाज दिला.

कोणीच प्रतिसाद दिला नाही. खोलीत गेलो, तर दोघंही गाढ झोपले होते.

मग तो आवाज कोणाचा होता…?

याच विचाराने त्या रात्री झोप लागली नाही. 

काही दिवसांनी आणखी एक विचित्र घटना घडली. स्वप्नील रात्री अभ्यास करत होता. मी आणि विकी झोपलो होतो.

आणि अचानक…

स्वप्नील जोरात किंचाळत उठला आणि आमच्या अंगावर धावून आला!

“सागर! विकी! माझ्या मागे कोणी तरी उभं होतं!”

त्याचा चेहरा भयाने पूर्णपणे पांढराफटक पडला होता. तो थरथरत होता.

“काय? कुठे?” मी घाईघाईने विचारलं.

“मी अभ्यास करत असताना, माझ्या खांद्यावर थंडगार हात ठेवल्यासारखं वाटलं. मी मागे वळलो… आणि… एक पांढऱ्या कपड्यातला मुलगा माझ्या मागे उभा होता!”

त्याच्या त्या शब्दांनी अंगावर काटा आला.

“मुलगा? कोण?”

“तो फक्त क्षणभरच दिसला… आणि नंतर डोळ्यांदेखात नाहीसा झाला.. त्याव्हा तो निर्वीकार चेहरा… आणि डोळे.. डोळे नव्हतेच.. त्यांच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या.. 

त्याने केलेलं असं वर्णन ऐकूण आम्ही ही घाबरलो. पण खोलीत कोणीही नव्हत. 

आम्ही खोली बदलायचा विचार करत होतो, पण त्याआधी हॉस्टेल मध्ये विचारपूस करायला सुरुवात केली आणि आम्हाला एक रहस्य कळलं.

त्या हॉस्टेलमध्ये काही वर्षांपूर्वी एक विद्यार्थी बेपत्ता झाला होता. त्याचं नाव अर्णव होतं.

तो शेवटचा कुठे दिसला होता माहितीये..? खोली क्रमांक १७ मध्ये! आणि त्या नंतर तो कोणालाच दिसला नाही. कोणी म्हणत होतं की त्याने आत्महत्या केली. कोणी म्हणत होतं की तो हॉस्टेल, घरं वैगरे सोडून पळून गेला.. 

त्या रात्री, विकी एकटाच खोलीत झोपला होता. मी आणि स्वप्नील काही कामानिमित्त बाहेर होतो.

पहाटे चारच्या सुमारास विकीचा घाबरलेला कॉल आला.

“लवकर परत या! काहीतरी भयानक घडलंय!”

आम्ही ताबडतोब हॉस्टेलकडे यायला निघालो.

जेव्हा आम्ही खोलीत पोहोचलो, तेव्हा विकी गार होऊन जमिनीवर बसलेला होता. तो घामाघूम झाला होता.

“काय झालं?” आम्ही विचारलं.

त्याने थरथरत सांगितलं—

“मी झोपलो होतो… आणि अचानक जाग आली. खोलीत एकदम शांतता होती. पण मला काहीतरी वेगळं जाणवत होतं… जणू कोणी तरी माझ्या पायाशी उभं आहे.

मी हलायचा प्रयत्न केला… पण माझं शरीर जणू गोठून गेलं होतं!

मी फक्त माझ्या डोळ्यांनी पाहू शकत होतो… आणि समोर… तोच मुलगा उभा होता!

त्याचा चेहरा पूर्ण काळा पडलेला… डोळे रक्ताळलेले… आणि हसण्याचा आवाज येत होता!

तो माझ्या दिशेने झुकायला लागला… आणि एकदम कानाजवळ पुटपुटला—”ही खोली माझी आहे!”

माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. मी जोरात किंचाळलो… आणि मला शरीराची हालचाल करता आली. तेव्हाच मी फोन करून तुम्हाला बोलावलं!”

त्या रात्रीनंतर आम्ही निर्णय घेतला—आता इथे राहणं शक्य नाही.

आम्ही वॉर्डनकडे जाऊन खोली बदलायची विनंती केली. वॉर्डन काहीच बोलले नाहीत… फक्त गंभीरपणे आमच्याकडे पाहत राहिले.

“तुम्ही पहिलेच नाही…हजारो विद्यार्थी इथून निघून गेले आहेत.”

“का?”

“कारण अर्णव अजूनही तिथेच आहे!” वार्डन चे ते एक वाक्य अजूनही माझ्या कानात घुमत. 

त्या दिवसानंतर आम्ही खोली क्रमांक १७ मध्ये कधीच परत गेलो नाही.

पण… आजही त्या खोलीतून काही वेळा रात्री आवाज येतात. कोणी म्हणतं तिथे कोणी तरी चालताना दिसतं. कोणी म्हणतं की तिथे कोणी तरी अजूनही बसलेलं असतं…!

Leave a Reply