अनुभव – अमोल

घटना 2019 ची आहे. मी एका इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो. कॉलेज चे नाव मी गुपित ठेऊ इच्छितो. हॉस्टेलची इमारत खूप जुनी होती. त्या जुन्या इमारतीला एक विचित्र, अनामिक वलय होतं. काही जण सांगायचे की पूर्वी इथे काहीतरी अघटीत घडलं होतं, पण कोणीही नक्की काय ते सांगत नसे. त्या वर्षी हॉस्टेलमध्ये माझं पहिलं वर्ष होतं. आमच्या हॉस्टेलच्या मेसवाल्या ताई, संगीता ताई, कायम प्रेमानं वागायच्या. पण एका संध्याकाळी, त्या अचानक गंभीर झाल्या आणि आमच्याकडे पाहत म्हणाल्या.. 

“पुढचे काही दिवस रात्री कोणीही मेसच्या मागच्या बाजूला जाऊ नका.”

मी सहज विचारलं, “का?”

त्या जरा वेळ गप्प राहिल्या. मग हलक्या आवाजात म्हणाल्या, “मला नाही सांगता येणार पण तुमच्या भल्यासाठी सांगतेय…”

त्यांनी असे म्हंटल्यावर मी ही विषय वाढवला नाही आणि तिथून निघून गेलो. 

त्या रात्री आम्ही तिघं—मी, रोहन आणि समीर—मेसमध्ये उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो होतो. रात्रीचे सुमारे साडेदहा वाजले असावेत. बाकी सगळे जेवून निघून गेले होते, आणि आम्ही तिघंच उरलो होतो.

गप्पा मारता-मारता समीर अचानक स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती उमटली.

“काही ऐकलंत का?” तो हलक्या आवाजात म्हणाला.

मी आणि रोहन ने कान देऊन ऐकलं पण आम्हाला कसलाही वेगळा आवाज येत नव्हता. तसे तो पुन्हा म्हणाला “नीट ऐका..” 

आधीच वातावरण शांत होतं तरी सुद्धा आम्ही कान टवकारून ऐकू लागलो. पण काहीच नाही. तितक्यात रोहन म्हणाला “तुला मस्करी करायला आम्हीच मिळालो का आज..?” तितक्यात मेस चा दरवाजा जोरात आपटला आणि बंद झाला. 

आम्ही तिघंही दचकून उभे राहिलो. संगीता ताई आत स्वयंपाक घरात होत्या आणि त्या आतूनच म्हणाल्या “ कसली आदळ आपट चालू आहे रे तुमची..?”. माझ्या तोंडून आपसूक बाहेर पडलं “ काही नाही ताई. “ 

“कुणीतरी बाहेर असेल,” रोहन म्हणाला आणि दरवाजाकडे चालत गेला. त्याने हळूच दरवाजा उघडला…

समोर कोणीच नव्हतं! त्याने आजू बाजूचा परिसर पहिला पण संपूर्ण भाग निर्मनुष्य होता. 

तो मागे वळला आणि आम्हाला म्हणाला “ बाहेर कोणीच नाहीये रे.. आणि वारा ही नाहीये मग हा दरवाजा इतक्या जोरात कसा काय आपटला.. “ आम्ही दोघ ही आश्चर्यजनक नजरेने त्याच्याकडे पाहत होतो. तितक्यात त्याच्या मागून वाऱ्याच्या वेगाने जोरात काही तरी गेले. आमची चांगलीच तांतरली. 

तो दरवाजा मेस च्या मागच्या भागात जाण्याचा होता. मला संगीता ताईचे वाक्य आठवले आणि मी म्हणालो “ ताई जेवण झालं आमच.. आम्ही खोली वर जातोय, आवरून घ्या.. “

आम्ही खोलीवर जाऊन झोपलो खरे पण मला मात्र काही केल्या झोप लागत नव्हती. ताईचे ते वाक्य सतत डोक्यात घोळत होतं, त्यात काही वेळा पूर्वी घडलेला प्रकार. मध्यरात्र उलटून गेली होती. याच विचारांच्या गदारोळात मला कधी झोप लागली कळलेच नाही. 

रात्री कधी तरी मला थोडी जाग आली. जाग येण्याचं कारण काही तरी वेगळंच होतं. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा ताडकन उठून बसलो. कारण मला माझ्या पायांवर थंडगार हाताचा स्पर्श जाणवला होता. समोर पाहिलं तर माझ्या बेड शेजारी कोणी तरी बसलेलं दिसलं. ते दृष्य पाहून माझ्या अंगावर भीतीने सर्राकन काटा आला. कारण रोहन आणि समीर बाजूला गाढ झोपले होते. मी दोघांना जागं करायचा प्रयत्न करू लागलो पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. ते जे काही होतं ते हळू हळू सरकत बेड वर येऊ लागलं. मी ओरडायचा प्रयत्न केला पण मी इतके घाबरलो होतो की तोंडातून आवाजच निघत नव्हता. तितक्यात रोहन ला जागं आली आणि माझ्याकडे पाहत म्हणाला “ काय रे.. असे काय करतोय.. काय झालं..? “.. मी त्याच्याकडे पाहून समोर बघण्याचा इशारा केला आणि.. त्या खोलीत आमच्या तिघांशिवाय कोणीही नव्हत. म्हणजे मला भास होतं होता..? नाही.. कस शक्य आहे. तो स्पर्श, ते बेड जवळ बसलेलं, नंतर वर आलं. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तो भास कसा असेल.. वेळ पाहिली तर साडे तीन झाले होते. मी नंतर झोपलोच नाही. सकाळी उठून संगीता ताईना भेटायला पहिले मेस मध्ये गेलो. मला त्यांना विचारायचं होतं कारण कदाचित त्यांना माहित असेल. 

घडलेला सगळा प्रसंग जश्याच्या तसा मी त्यांना सांगितलं. ती शांत ऐकत राहिली आणि मग म्हणाली.. हीं मेस पूर्वी एका मेस पूर्वी एका केटररकडे होती. काही वादामुळे बाहेरच्या लोकांनी येउन त्याला जबर मारहाण केली होती. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्याला मारून मेस च्या मागच्या बाजूला टाकून दील होतं. काही लोकं म्हणतात की त्याचे प्रेत तिथेच पूरले होते तर काही म्हणतात की त्याचे नातेवाईक येउन त्याला घेऊन गेले. खरे काय ते मला ही माहित नाही. पण 

तेव्हा पासून वर्षाच्या मार्च महिन्यात काही दिवस त्याचा आत्मा तिथे भटकतो. म्हणून मी तुम्हाला सांगत होते की पुढचे काही दिवस मेस च्या मागच्या बाजूला जाऊ नका..  मला हीं मेस चालवायला घ्यायची नव्हती. पण आर्थिक अडचण असल्याने माझा नाईलाज आहे. 

ताईचे बोलणे ऐकूण आम्ही सुन्न झालो होतो.

त्या दिवसानंतर आम्ही रात्री उशिरा मेसमध्ये बसणं पूर्णपणे बंद केलं. पण कधी कधी, आम्हाला अजूनही रात्रीच्या गडद शांततेत मेस च्या मागच्या बाजूला कोणी तरी असल्याचे भास होतात. आजही, जेव्हा आम्ही आठवण काढतो, तेव्हा अंगावर सर्रकन काटा उभा राहतो. कदाचित, त्या आत्म्याला अजूनही काहीतरी सांगायचं आहे…

Leave a Reply