अनुभव – संस्कृती ठाकूर
अनुभव माझ्या वडिलांना आला होता जेव्हा ते माझ्या वयाचे होते म्हणजे तेव्हा त्यांचे वय 19 ते 20 असेल. माझ्या वडिलांना ऐकूण 4 भावंड, 2 भाऊ आणि 2 बहिणी. त्यात एका बहिणीचं लग्न झालं होतं. तिचं सासर गावातच होतं. तिच्या नवऱ्याची म्हणजे माझ्या आत्याजिंची नाईट अहिफ्ट असायची. त्यामुळे ते कधी कधी रात्री घरा बाहेर असायचे. तिचे सासू सासरे ही तिच्या दिराकडे राहायचे म्हणून ती घरी एकटीच असायची. त्यामुळे कधी कधी माझ्या लहान आत्याला म्हणजे अस्मिता आत्याला घरी झोपायला बोलवायची. त्या दिवशी नेहमी प्रमाणे आत्याजी ची नाईट शिफ्ट असल्याने तिने अस्मिता आत्याला घरी बोलावले. त्या दोघी झोपून गेल्या. इथे वडिलांच्या घरी ही सगळे गाढ झोपले होते. रात्री 2 च्या सुमारास दारावर थाप पडली. त्या आवाजाने वडिलांना जागं आली. ते उठले आणि दाराजवळ गेले. इतक्या रात्री थेट दार उघडण्या आधी त्यांनी कोण आहे हे विचारले. तर बाहेरून त्यांच्या लहान बहिणीचा म्हणजे माझ्या अस्मिता आत्याचा आवाज आला “ दादा दरवाजा उघड मी आहे “.
तिचा आवाज ऐकूण ते लगेच दार उघडायला गेले तेवढ्यात मागून आजी आली आणि वडिलांना ओरडली “ दरवाजा उघडू नकोस.. मागे हो.. “ त्यांना काही कळलेच नाही की आजी असे कां बोलतेय. ते आजी ला समजाऊ लागले “ अग.. असं काय करतेय.. बाहेर अस्मिता आली आहे तिला तसेच ताटकळत ठेवायचं कां..” त्यावर आजी म्हणाली “ ती अस्मिता नाहीये “. वडील तरीही ऐकत नव्हते. मग आजी ने त्यांना सांगितले “ तुला पटत नाहीये ना.. दरवाजाच्या बाजूला खिडकी आहे ना तिथून हळूच बाहेर बघ कोण आहे.. “. ते लगेच पाहायला गेले आणि त्यांना खरा प्रकार कळून चुकला. बाहेर कोणीही दिसत नव्हतं पण दार वाजवण्याचा आवाज मात्र सतत येत होता. त्यात अस्मिता आत्त्याचा आवाज ही अगदी स्पष्ट ऐकू येत होता. ते घाबरून घरात आजी जवळ आले. . त्या रात्री त्यांना झोपच आली नाही. सकाळी त्यांना खूप ताप भरला होता. अस्मिता आत्या जेव्हा घरी आली तेव्हा खात्री करायला वडिलांनी तिला विचारले “तु रात्री इकडे आली होतीस का ” तर ती म्हणाली ” नाही.. इतक्या रात्री ताई ला ऐकटे ठेऊन मी कां येऊ.. मी तर ताई कडे झोपले होते.. “
तेवढ्यात आजी आली आणि तीने वडिलांना सांगीतल की काल अमावस्या होती आणि तो आवाज हाकामारी चा होता. जे त्या भागात आहे आणि ते असंच अमावस्येला लोकांच्या घरी जाऊन दार वाजवते. हाक मारते. आणि जो दार उघडतो त्याला सोबत घेऊन जाते. माझ्या वडिलांचे नशीब चांगले होते की आजीने येउन त्यांना अडवले म्हणून ते वाचले.