अनुभव – स्वप्नील कुलकर्णी
मी लहानपणापासून मुंबईमध्ये स्थायिक आहे. माझे बाबा, आजोबा आणि संपूर्ण कुटुंब आधी गावी राहत होते, पण कामानिमित्त मुंबईला आले आणि इथेच लहानाचे मोठे झाले. आता सगळीकडे मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत, मात्र ज्यांनी जुनी मुंबई पाहिली आहे, त्यांना ती काहीतरी वेगळीच वाटायची. गर्दी होती, पण आताच्या तुलनेत कमी, आणि बहुतांश लोक चाळींमध्ये किंवा लहानमोठ्या इमारतींमध्ये राहायचे. जे लोक चाळींमध्ये राहायचे, त्यांनी तिथला एक वेगळाच अनुभव घेतला असेल. लहानशा खोलीत बरंच मोठं कुटुंब राहायचं. शौचालय बाहेर असायचं. पण त्या परिस्थितीतून माणसाला जीवनाची शहाणपणाची शिकवण मिळायची, दुनियादारी समजायची, छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व कळायचं, आणि तिथली माणसं तर नेहमीच मदतीसाठी तयार असायची. असो, आज मी तुम्हाला जे अनुभव सांगणार आहे, ते अस्सल मुंबईतील चाळीमधले आहेत.
शहरी ठिकाणाचं नाव मी सांगणार नाही, कारण मला ते योग्य वाटत नाही. चाळीचं नावही काही कारणांमुळे बदलतो आहे, त्यामुळे यासाठी मला माफ करा. हा अनुभव माझ्या वडिलांनी सांगितलेला आहे, जेव्हा ते कॉलेजमध्ये शिकत होते. दत्तात्रय चाळीत माझे वडील, माझी आजी, आजोबा आणि माझ्या तीन आत्या दोन छोट्या खोल्यांमध्ये राहत होते. घर लहानसं होतं, फक्त वर माळा चढवलेला होता, त्यामुळे ते थोडं मोठं वाटायचं. आजोबा गावाला ये-जा करत असायचे. त्या वेळी आमचे शुक्ला नावाचे शेजारी होते. त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा दिपेन हा माझ्या बाबांचा चांगला मित्र होता. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला पाच महिन्यांची मुलगी होती. माझे बाबा त्याला “दिपू भैय्या” म्हणायचे. आमचं त्यांच्या घराशी अगदी घरच्यासारखं नातं होतं, कारण अभ्यासात वगैरे त्याने बाबांना खूप मदत केलेली. पण लग्नानंतर दिपेन आणि त्याच्या बायकोचं सतत भांडण व्हायचं.
दिपेनची बायको, जिने आम्हाला “भाभी” म्हणायचं, तिचं काही ना काही कारणावरून दिपेन किंवा तिच्या सासूशी वाद होत असायचे. मुलगी झाल्यानंतरही त्यांच्या घरातलं भांडण काही कमी झालं नाही. माझ्या आजीने, आत्यांनी आणि तिच्या कुटुंबीयांनीही तिला खूप समजावलं, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. बाबांनी तेव्हा १२वीची परीक्षा दिली होती आणि पार्ट-टाइम म्हणून एका पंख्याच्या दुकानात काम करत होते. दुकान रात्री ९ वाजता बंद व्हायचं, त्यामुळे बाबांना घरी पोहोचायला १०-१०:३० वाजायचे.
एका दिवशी बाबा दुकानात जायला निघालेच होते, तेवढ्यात त्यांना आरडाओरडा ऐकू आला. त्यांनी पाहिलं तर समोर खूप गर्दी जमली होती. जवळ जाऊन बघितलं तर शुक्ला परिवाराच्या घरातून भाभी धावत बाहेर आली, पण तिच्या कपड्यांना आग लागलेली होती. ती अक्षरशः समोर जमलेल्या लोकांसमोर धडपडत होती, तिचं सगळं अंग भाजून काळंठिक्कर झालं होतं. बाबा आणि तिथल्या काही लोकांनी तिला पाणी ओतून विझवायचा प्रयत्न केला आणि तात्काळ अँब्युलन्सला बोलावलं. पण दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचायच्या आधीच भाभीने प्राण सोडले. संपूर्ण चाळीमध्ये शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव शरीर चाळीत आणण्यात आले. त्यावर अंत्य विधी करण्यात आले. आणि काही दिवसांनी त्यांच्या घरचे गावी निघून गेले.
पण खरी गोष्ट त्यानंतर सुरू झाली. चाळीत विचित्र घटना घडायला लागल्या. एकदा बाबा रात्री ११च्या सुमारास घरी परत आले. त्यांना त्या दिवशी खूपच उशीर झाला होता. चाळीत पोहोचल्यावर त्यांना लक्षाला आलं की सगळीकडे एकदम शांतता पसरली आहे. जी इरविपेक्षा खूप विचित्र वाटत होती. ते हळूहळू आपल्या घराच्या दिशेने चालत होते, तेवढ्यात त्यांना असं जाणवलं की कुणीतरी त्यांच्या मागे आहे. त्या वेळी चाळीत फारशा लाइट्स नसत, फक्त रस्त्यावरच्या दिव्यांचा उजेड होता. त्यांनी मागे वळून पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं.
बाबा पुन्हा चालायला लागले, पण पुन्हा त्यांना वाटलं की कुणीतरी मागे चालत आहे. या वेळी त्यांनी मागे वळून पाहिलं, आणि जे दिसलं त्याने त्यांचे धाबे दणाणले. त्यांच्या अगदी मागे, हातभर अंतरावर, एक बाई उभी होती. पण त्या बाईचा चेहराच नव्हता! बाबांनी ते दृश्य पाहताच शक्य तितक्या जोरात तिथून पळ काढला. घराच्या बाहेर पोहोचले आणि घाईघाईने दार वाजवू लागले. पण मागे वळून बघतात तर काय ती बाई त्यांच्या मागे त्यांच्या घरा पर्यंत आली होती. ते आजीला जोर जोरात हाका मारू लागले आणि जोरात दार बडवू लागले. आतून आजीने दरवाजा उघडला, आणि बाबा घरात शिरताच त्यांनी जोरात दार लावून घेतलं. आजीने इतकं घाबरण्याचं कारण विचारलं तेव्हा बाबांनी सगळं सांगितलं. तिने थेट दरवाजा उघडला आणि बाहेर बघून आली. “बाहेर काही नाहीये, तू जेव आणि झोप,” असं म्हणत तिने बाबांसाठी जेवण वाढलं.
पण ते मात्र खरंच घाबरले होते. आजीने त्यांना शांत केलं आणि समजावत म्हणाली, “असं काही नसतं. हे फक्त तुझ्या मनाचे खेळ असतील.” पण बाबा मात्र त्या घटनेबद्दल विचार करू लागले. त्यांच्या मनात मात्र एकच गोष्ट स्पष्ट होती – ते जे पाहिले होते, तो काही भास मुळीच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आणि आत्या लवकर उठले, पण आजी मात्र अजूनही उठली नव्हती. सगळ्यांनी तिला खूप वेळ हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. काही हालचालही नव्हती. तेवढ्यात माझी पणजी आजी म्हणजेच बाबांची आजी आली. तिनेही तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही आजी कसलीच हालचाल करत नव्हती. चाळीमधले बरेच लोक येउन पाहून गेले, हाका मारून उठवायचा प्रयत्न करून गेले. डॉक्टरही येऊन तपासून गेले, पण काही विशेष सांगू शकले नाहीत. त्यामुळे सगळे गोंधळून गेले होते.
पणजी आजीला मात्र काहीतरी संशय आला. तिने आत्या आणि बाबांकडे पाहत विचारलं, “काल काही विशेष घडलं होतं का?” तेव्हा बाबांनी आदल्या रात्री घडलेला प्रकार तिला सांगितला. हे ऐकताच ती घाईघाईने बाहेर गेली आणि काही वेळाने एका अनोळखी माणसाला घेऊन परत आली. त्या व्यक्तीच्या पोशाखाकडे पाहून असं वाटत होतं की तो एखादा मांत्रिक असावा. तो घरात आला आणि एक कटाक्ष टाकताच त्याने सांगितलं, “तुमच्या आजीला बाहेरची बाधा झाली आहे”. नुसते पाहताच त्याने कसे काय अचूक हेरले त्याचे त्यालाच माहित. त्याने काही विधी सुरू केले. काही मंत्र पुटपुटले, आणि काही वेळा नंतर हळूहळू आजीने हालचाल केली. काही मिनिटांतच ती भानावर आली. मात्र, जेव्हा तिला विचारलं की तिला काय झालं होतं, तेव्हा तिला काहीच आठवत नव्हतं! त्या मांत्रिकाकडे सगळ्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तो म्हणाला, “तुमच्या आजीला चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी जाणं महागात पडलंय. त्यामुळेच त्यांना बाहेरची बाधा झाली होती.
हे ऐकून सगळे अजूनच घाबरलेले होते. मग आत्यानं विचारलं, “तुम्ही काहीतरी कायमस्वरूपी उपाय करू शकता का?” त्यावर तो मांत्रिक गंभीर होत म्हणाला, “माझ्याकडे एवढी शक्ती नाही, पण माझ्या ओळखीचे एक गुरुजी आहेत. त्यांना यासारख्या गोष्टींचा दांडगा अनुभव आहे. मी त्यांच्याशी बोलतो… पण त्याला थोडा वेळ लागेल.” असं म्हणत त्याने निरोप घेतला, आणि सगळ्यांच्या मनात अजूनही भीती आणि उत्सुकता दाटून राहिली. काही दिवसांनी आजोबा गावी जाऊन परत आले. त्यांना जेव्हा आजी आणि बाबांसोबत घडलेले प्रसंग सांगितले, तेव्हा ते हादरले. आजोबांना अशा गोष्टींची बरीच माहिती होती, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना धीर द्यायला सुरुवात केली.
दरम्यान, चाळीत अजून एक विचित्र अफवा पसरली. काही लोक म्हणयाला लागले की, एक बाई रात्री अधूनमधून दिसते. काही जणांनी तिचं अस्तित्व अगदी जवळून अनुभवलं होतं. त्या बाईचं अंग एकदम काळं ठीक्करं होतं.. आणि अंगकाठीला अगदी बारीक, डोळे खोल गेलेले आणि केस विस्कटलेले असायचे. ज्या लोकांनी तिला पाहिलं होतं, त्यांना ती रात्रीच्या अंधारात केव्हा-कुठे दिसेल हे सांगता येत नव्हतं. काही जणांनी हे सगळं फक्त अफवा म्हणून उडवून लावलं, पण चाळीतल्या अनेकांनी हे अनुभवलं होतं, त्यामुळे यात काहीतरी सत्य असणारच, हे सगळ्यांना माहित होतं. रात्रीच्या वेळी तर चाळीत भयानक शांतता असायची. अंधार पडायला लागला की चाळीचा परिसर, आजूबाजूच्या गल्ल्या ओस पडू लागल्या. रात्री एखादा बल्ब चालू असला तरी त्याचा उजेड किती लांब पोहीचणार. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य असायचे. त्या काळात सार्वजनिक शौचालय असायचे आणि ते चाळीपासून काही अंतरावर बाहेर असायचे, त्यामुळे रात्री तिथे जाण्यासाठी लोकांना हातात छोटासा दिवा घ्यावा लागायचा.
एका रात्री, नेहमीप्रमाणे ते शौचास गेले. हातात दिवा होता. सगळीकडे गडद अंधार पसरला होता. त्या दिव्याच्या हलक्या प्रकाशात आणि त्या काळोखात चाळीत फिरणाऱ्या बाईच्या अफवा मनात खोलवर रुतत होत्या. पण आजोबा तसे धैर्यवान होते. त्यांना अशा गोष्टींची सवय होती, त्यामुळे त्यांनी कधीच भीती वाटू दिली नाही. ते हात धुवायला बेसिन कडे वाकले, आणि अचानक त्यांची नजर स्टीलच्या नळावर पडली. त्या नळाच्या चमकणाऱ्या पृष्ठभागावर काहीतरी हलताना दिसलं. त्यांनी नीट पाहिलं, आणि त्यांचं काळीज थरारलं! त्यांच्या बाजूलाच एक काळी सावली उभी होती!
त्या आरशासारख्या चमकणाऱ्या नळात स्पष्ट दिसत होतं की, कोणीतरी काळ्या साडीमध्ये, विस्कटलेल्या केसांसह त्यांच्या मागे उभ आहे. त्यांनी नीट निरखून पाहिलं आणि जाणवलं की ते अगदी हळू हळू सरकत त्यांच्या जवळ येतय. क्षणात आजोबांनी हातातला दिवा टाकून दिला आणि झपाझप पावलं टाकत घराकडे यायला निघाले.! त्यांच्या मागे कोण आहे, हे पाहण्याची त्यांची हिंमतच झाली नाही. जिवाच्या आकांताने येत घरात पोहोचले, दार लावून घेतलं. घरातले सगळे गाढ झोपले होते. त्यांनी ही घटना घरच्यांना सांगितली नाही, कारण आधीच सगळे भयभीत होते. दिवस पुढे सरकत होते. एके दिवशी बाबांना त्यांच्या दुकानमालकाने सिनेमाची काही तिकिटं दिली. घरच्यांना सिनेमाची प्रचंड आवड होती. तेव्हा सिनेमागृह सुद्धा चाळीच्या जवळच होतं, त्यामुळे रात्री उशिरा घरी परतता येत असे.
त्या रात्री सगळे कुटुंब म्हणजे बाबा, आजोबा, आजी, आत्या आणि पणजी आजी हे सगळे सिनेमा पाहायला गेले. सिनेमा रात्री उशिरा संपला, त्यामुळे घरी पोहोचायला उशीर झाला. चाळीच्या गेटजवळ पोहोचल्यावर पणजी आजीला तपकीर ओढण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्या दोन मिनिटं थांबल्या आणि तपकीर ओढू लागल्या. एव्हाना आजोबा आणि आत्या काही अंतर चालत पुढे निघून गेले. ते नजरे आड झाले नव्हते पण बऱ्यापैकी लांब गेले होते. तितक्यात अचानक एका अंधाऱ्या कोपऱ्यातून आवाज आला – “ए म्हतारे… थांब तिथेच!” तो किळसवाणा जीवघेणा आवाज ऐकताच पणजी आजी थरथर कापायला लागल्या. आवाज एकदम कर्कश आणि भारी वाटत होता, जणू तो माणसाचा नव्हताच! त्या बाजूला पूर्ण अंधार होता, आणि त्या अंधारातून तो आवाज येत होता.
क्षणाचाही विचार न करता पणजी आजी घाबरून चाळीच्या दिशेने पळू लागल्या. त्या पळताना त्यांनी परत एक भयानक आवाज ऐकला “आता सुटलीस म्हातारे… पण पुन्हा कुठेतरी सापडशीलच माझ्या तावडीत!” ती घरात आली आणि तिला पाहून सगळेच घाबरले. त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता, घसा कोरडा पडला होता आणि हात थरथरत होते. जेव्हा त्यांनी हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला, तेव्हा सगळे अक्षरशः थरारून गेले. बाबांनी शेवटी भीतीपोटी दुकानाची नोकरी सोडली. रोज उशीर होणे आणि त्या भयाण वातावरणात रात्री घर गाठणे, हे अधिक काळ सहन करणे त्यांना शक्यच नव्हते. आता प्रश्न असा होता की हे सगळं कधी संपणार? एक दिवस तोच मांत्रिक पुन्हा घरी आला.
त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी गंभीर भाव होते. तो म्हणाला, “ते गुरुजी पुन्हा आले आहेत. आणि लवकरच ते या चाळीत येणार आहेत.” या सगळ्या प्रकरातून बाहेर पडण्याचा एक आशेचा किरण दिसला. अखेर एका गुरुवारी ते गुरुजी चाळीत आले. त्यांनी संपूर्ण चाळ फिरून पाहिली आणि सगळीकडे एक विचित्र अस्वस्थ करणार वातावरण त्यांना जाणवलं. काही वेळ शांत राहून त्यांनी डोळे मिटले आणि मंत्र पुटपुटले. मग ते हळूहळू बोलू लागले “इथे एका अमानवीय शक्तीचा वास आहे. पण हे सहजासहजी निघून जाणार नाही.” सगळे काळजीत पडले. तेव्हा गुरुजी म्हणाले, “यावर एकच उपाय आहे – इथे दत्त महाराजांचे छोटेसे मंदिर स्थापन करावे लागेल आणि त्याची नित्यनियमाने पूजा करावी लागेल.”
चाळीच्या एका बाजूला एक मोठे झाड होते. गुरुजींनी सांगितले की, त्या झाडाखालीच मंदिराची स्थापना करायची. सर्वांनी मिळून ठरवलं आणि काही दिवसांतच छोटं दत्त मंदिर उभारलं गेलं.
मंदिराच्या स्थापनेनंतर हळूहळू भयावह घटनांमध्ये घट होऊ लागली. ज्या गोष्टी रोज ऐकू यायच्या, दिसायच्या त्या कमी झाल्या. काही महिन्यांत तर सगळंच थांबलं! हळूहळू काळ बदलला. त्या चाळीचा पुनर्विकास झाला आणि तिथे एक मोठी इमारत उभी राहिली. पण मंदिर आणि ते झाड तसेच ठेवण्यात आले.
26 जुलै 2005 ला मुंबईत आलेल्या प्रचंड पुरात, त्या मंदिरावर उभे असलेले झाड मोठ्या वादळामुळे उन्मळून पडले. त्या वेळी त्याच्या आजूबाजूच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, त्या इमारतीला काहीच झाले नाही! काही जाणकार लोकं म्हणाले की, त्या झाडाने त्या इमारतीवरील संकट स्वतःवर घेतले. आजही ते मंदिर तिथेच आहे…इतक्या वर्षांनंतरही… आजही तिथे नियमित पणे पूजा केली जाते. त्या मंदिरामुळेच कदाचित चाळीवर आलेलं संकट टळलं होतं… पण त्या भयावह रात्रींच्या आठवणी मात्र अजूनही जिवंत आहेत!