अनुभव – रोहन

माझा हा अनुभव 2012 सालचा आहे, जेव्हा मी माझ्या गावी सुट्टीसाठी गेलो होतो. हा अनुभव फक्त माझ्या आयुष्यातला नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक भयानक आठवण बनला आहे. मी मुंबईत राहतो, पण दर वर्षी सुट्टीत आम्ही आमच्या गावाला जात असतो. माझं गाव महाराष्ट्राच्या एका टोकाला डोंगराळ भागात आहे. गावात भरपूर हिरवळ, डोंगर, नद्या, आणि शांत वातावरण असल्याने मला तिथे खूप आवडतं. त्या वर्षी मी एकटाच गावी जाण्याचा निर्णय घेतला होता, कारण माझ्या कुटुंबीयांना काही कामांमुळे येता येणार नव्हतं. मी गावात पोहोचलो तेव्हा रात्रीचे ८ वाजले होते. गावात फारशी वर्दळ नव्हती, आणि वीज गेल्यामुळे सगळीकडे काळोख पसरला होता. आमचं घर गावाच्या थोडं बाहेर आहे, आणि तिथे पोहोचण्यासाठी एका लहानशा पायवाटेने जावं लागतं. 

रस्ता लहान आणि एकाकी होता. दोन्ही बाजूला मोठी झाडं होती, जी त्या रात्रीच्या अंधारात अजूनच भीतीदायक वाटत होती. माझ्या हातात फक्त एक टॉर्च होती. चालता चालता मला जाणवलं की, जणू काही झाडांच्या मागून कुणीतरी मला पाहत आहे. मी तसं दुर्लक्ष केलं आणि पुढे चालत राहिलो. अचानक मला एका झाडाच्या खोडामागे काहीतरी हालचाल जाणवली. मी टॉर्च त्या दिशेने वळवली, पण काहीही दिसलं नाही. मला वाटले की नक्कीच भास झाला असणार. पण नंतर जरा अस्वस्थ वाटायला लागलं. काही पावलं चाललो असेन तितक्यात बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली. आता मात्र मला भीती वाटू लागली. मी लगेच झपाझप चालायला सुरुवात केली, पण जसं मी वेगाने चालायला लागलो, तसं मागे काहीतरी माझ्या जवळ येत असल्याचं मला जाणवलं. पण मागे वळून पाहायची हिम्मत होतं नव्हती. थोरा मोठ्यांकडून ऐकलं होतं की अश्या वेळी शक्यतो मागे वळून पाहायचे नाही. 

आता माझं लक्ष समोरच्या रस्त्यावर केंद्रित केलं होतं.  माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता – कसंही करून घर गाठायचं. 15 मिनिटांच्या पायपिटी नंतर मी घरी पोहोचलो. दरवाजा उघडून आत गेल्यावर माझ्या श्वासाचा वेग वाढलेला होता. आजोबा आणि मावशी मला पाहून म्हणाले, “काय झालं? असा का घाबरलायस?” मी त्यांना काहीच सांगितलं नाही, फक्त असं सांगितलं की रस्त्यावर खूप अंधार होता म्हणून जरा अस्वस्थ झालो. मी त्या रात्री काही खाल्लं ही नाही. मला झोप लागेना. रात्री साधारण २ वाजता मला खिडकीच्या बाहेर काहीतरी हालचाल जाणवली. मी उठून पाहिलं, तर खिडकीजवळ एक लहान मुलगी डोकावून पाहत होती. 5 वर्षांची असेल अंदाजे. ती काही तरी बोलायचा प्रयत्न करत होती पण मला ते कळत नव्हतं. बघता बघता ती जोरात ओरडली पण तिचा आवाज लहान मुलीचा नाही तर एखाद्या मोठ्या माणसासारखा होता.

मी धावत रूम मधून बाहेर आलो आणि आजोबांकडे गेलो. त्यांनी मला शांत करत विचारलं, “काय झालं?” मी त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “तू झोप. सकाळी पाहू या.” सकाळी आजोबांनी गावच्या मंदिरातील पुजाऱ्याला बोलावलं. त्याला सगळं सांगितलं. पुजाऱ्याने सांगितलं की, “त्या वाटेवर एका लहान मुलीची आत्मा एका जुन्या झाडाशी बांधली आहे.. ती पुन्हा मोकळी झाली असणार.. ती आत्मा याला त्रास देऊ शकते, पण घाबरू नका. आपण काही तरी उपाय करू..” त्या दिवशी गावातील लोकांनी एकत्र येऊन त्या झाडाजवळ पूजा केली आणि त्या लहान मुलीच्या आत्म्याला तिथल्या मोठ्या झाडाला बांधलं गेलं. त्या खाली एक काळा दगड ठेवला गेला. सगळ्यांनी त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. दर वर्षी तिथे नारळ चढवू आणि पूजा घालू असा संकल्प केला गेला. 

त्या अनुभवाने मला शिकवलं की, काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. आपण जरी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विश्वास ठेवत असलो तरी, काही वेळा अध्यात्मिक गोष्टींनाही आपल्याला महत्त्व द्यावं लागतं. आजही मी त्या रात्रीचा विचार करतो, तेव्हा अंगावर काटा येतो. ती आठवण माझ्या मनात खोलवर कोरली गेली आहे.

Leave a Reply