त्या रात्री आम्ही पाच मित्र – मी, रोहन, संकेत, जय आणि आदित्य – मुंबईहून पुण्याला खंडाळा घाट मार्गे गाडीतून प्रवास करत होतो. आमचा उत्साह शिगेला होता कारण मित्रांसोबतचा हा एक छोटा पण मजेशीर प्रवास होता. रात्रीचे साधारण 11 वाजले होते, आणि घाटात प्रवेश करताच थंड वारा आणि गडद अंधाराचं वातावरण तयार झालं होतं. रस्ता निर्जन आणि शांत होता. रात्रीची वेळ असल्यामुळे घाटात गाड्या कमी झाल्या होत्या, आणि फक्त आमच्या गाडीचे हेडलाईट्स रस्त्याला उजळवत होते. घाटाची ती वळणं, एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, यामुळे आम्ही अगदी सावधपणे प्रवास करत होतो. वातावरणात काहीतरी वेगळं जाणवत होतं – एक अनामिक शांतता, जी अंगावर काटा आणत होती. तितक्यात संकेत म्हणाला कि मला लघवी आली आहे तर गाडी रस्त्या कडेला पार्क करा. आदित्य ने त्याला सांगितले कि अशी घाटात मध्येच गाडी थांबवायला नको. घाट संपला कि आपण थांबू, तो पर्यंत तू कंट्रोल कर. पण संकेत ऐकायला तयार नव्हता म्हणून आम्ही गाडी थांबवली. तिथे रस्त्याचा एक भाग अरुंद होता आणि त्या बाजूला एक पडकं धरण दिसत होतं. संकेत उतरून रस्त्याच्या आतल्या बाजूला लघवी करायला गेला. आम्ही चोघे गाडीतच बसून होतो. तितक्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजुहून आम्हाला अचानक कुजबुज ऐकू आली. जसे 2-3 जण आप आपसात बोलत असावेत. 

“कुणाला आवाज ऐकू आला का?” आदित्यनं विचारलं.

“नाही रे, घाटात वारा असा असतो भास होतोय आपल्याला,” जय म्हणाला, पण त्याचा आवाज थोडा घाबरलेला वाटत होता.

संकेत आला आणि आम्ही पुढे निघालो. पण एका वळणावर काही विचित्र घडलं. गाडीचा वेग अगदी कमी होता. आम्ही एक वळण घेतलं आणि मी जोरात करकचून ब्रेक मारला. कारण समोर पाहतो तर काय, रस्ता जणू संपला होता. हेडलाईट्स फक्त दाट धुकं दाखवत होते. आम्ही गोंधळून गेलो, कारण हा घाट आम्ही अनेकदा पार केला होता.

“रस्ता कुठे गेला? पुढचं काहीच कस दिसत नाहीये” रोहननं घाबरत विचारलं. मी हिम्मत करून 20-25 मिटर गाडी पुढे नेली पण काहीच दिसेना. असे ड्राइविंग करत राहिलो तर घाटाच्या दरीत पडून अपघात होणं नक्की होतं. आम्हाला वाटलं, कदाचित आम्ही चुकीच्या मार्गावर आलोय. मी गाडी थांबवली पण आम्ही कोणीही गाडीतून खाली उतरलो नाही. GPS तपासलं, पण त्यात सिग्नल च नव्हता. तेवढ्यात गाडीच्या इंजिनमध्ये काहीतरी गडबड झाली आणि गाडी बंद पडली. आम्ही सगळे गोंधळलो. मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण ती सुरू होईना. आता गाडीतून बाहेर येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्या गडद अंधारात आम्ही गाडीच्या बाहेर आलो. आजूबाजूला फक्त डोंगर आणि झाडं होती. त्या परिसरात एक विचित्र थंडावा जाणवत होता, जणू आम्ही एखाद्या अज्ञात जागेवर उभे होतो. आम्ही काय करावं हा विचार करत होतो, तेवढ्यात गाडीभोवती हलक्या हालचाली ऐकू आल्या. झाडीतून काहीतरी हलत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. जय म्हणाला, “कुणीतरी आपल्याला पाहतंय.” आम्ही सगळे स्थिर झालो. आवाज जवळ येत होता, पण काहीच दिसत नव्हतं. आम्ही एकमेकांना घट्ट पकडून गाडीत बसलो. एका क्षणी गाडीच्या मागच्या काचेतून आम्हाला जणू एक हलकासा प्रकाश चमकताना दिसला. आदित्य म्हणाला, “हे काय आहे?” आम्ही मागे वळून पाहिलं तर हळूहळू त्या प्रकाशाचे स्वरूप बदलू लागलं आणि आम्हाला 4 आकृत्या दिसू लागल्या. आम्हा सगळ्यांची चांगलीच तांतरली होती. त्या आकृत्या जस जश्या जवळ आल्या तश्या स्पष्ट होऊ लागल्या. त्यांचे रूप पाहून आम्ही प्रचंड घाबरलो कारण त्या 4 आकृत्यानी आमचेच रूप घेतले होते. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं जे पाहून आम्ही खूप अस्वस्थ झालो.. 

“बघू नकोस तिकडे गाडी काढ पटकन” संकेत म्हणाला. 

गाडी सुरू करण्याचा शेवटचा प्रयत्न केला, आणि यावेळी सुदैवाने ती सुरू झाली. आम्ही तिथून वेगाने निघालो. पण खूप काळजीपूर्वक चालवत होतो कारण समोर आम्हाला काहीही दिसत नव्हतं. घाटाच्या शेवटी पोहोचल्यावर आम्हाला समोरून येणारी पहिलीच गाडी दिसली तेव्हा कुठे धीर आला. पहाटे आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. मी काही मित्रांकडे चौकशी केली तेव्हा कळले कि “त्या भागात जुन्या धरणाच्या पाण्यात बरेच लोक बुडाले आहेत. रात्री तिथे कोणीही जात नाही.” आम्ही तिथून निघालो, पण त्या रात्रीचा अनुभव आमचं आयुष्यभर लक्षात राहील. खंडाळा घाटातल्या त्या भागाने आम्हाला जणू मृत्यूच्या कुशीत ओढल्यासारखं वाटलं. आजही आम्ही त्या क्षणांचा विचार केला की अंगावर काटा येतो.

Leave a Reply