अनुभव – अभिजित
हा प्रसंग साधारणपणे दहा वर्षांपूर्वीचा आहे. मी माझ्या खेड्यातील एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. आमचं गाव कोकणातलं, समुद्राच्या काठावर वसलेलं आहे. सगळं गाव शांत, निसर्गरम्य, पण काहीसं अंधुक गूढतेनं भरलेलं. माझ्या आजीने लहानपणीच सांगितलं होतं की आमच्या गावात एका विशिष्ट भागात झाडाखाली रात्री कोणीही जात नाही. मी आवर्जून या जागेचं नाव घेत नाहीये. असो. मी या गोष्टीला लहानपणी फारसं मनावर घेतलं नाही, पण त्या रात्रीनं मला त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडलं. त्या दिवशी लग्नाचा हंगाम रंगला होता. नातेवाईक, मित्रमंडळी जमलेली होती. रात्री साधारणपणे दहाच्या सुमारास आम्ही जेवण उरकून थोडं गप्पा मारायला बसलो. गप्पा रंगत होत्या, पण मी थोडा थकलो होतो. गावी गेल्यावर नेहमीप्रमाणे रात्री चालायला बाहेर पडायची मला सवय होती. त्या दिवशीही मी तसंच बाहेर पडलो. माझा मित्र अर्जुनही सोबत यायला तयार झाला.
आम्ही गावाबाहेरच्या जुन्या पायवाटेनं समुद्राकडे चालायला सुरुवात केली. थंड गार वारा वाहत होता, चंद्रावर ढग दाटून आले होते, आणि सगळीकडे गडद अंधार पसरलेला होता. आम्ही चालत होतो, तेव्हा अर्जुननं मला सांगितलं की या वाटेवरचं त्या भागातले एक झाड म्हणजे गावातलं “नजर झाड” म्हणून ओळखलं जातं. त्यानं सांगितलं की या झाडाखाली जास्त वेळ कोणी थांबल की तो परत येत नाही. मी त्याला हसत म्हणालो, “अरे, अशा गोष्टी खर्या कशा असतील? फक्त लोकांची भीती वाढवायचं काम!. काळ बदललाय आता. लहानपणी ऐकलं होतं आणि आताच्या काळात ही अश्या गोष्टींवर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणाच लक्षण आहे..” चालताना आम्ही त्या झाडाजवळ आलो. झाड खरंच भयंकर दिसत होतं – प्रचंड मोठं अगदी आक्राळ विक्राळ, पसरलेलं, आणि त्याच्या फांद्या.. जणू एखाद्या राक्षसाचे हातच. अर्जुनने भीतीपोटी त्या दिशेने चालणं थांबायचं सुचवलं. पण मी जरा पुढे जाऊन त्या झाडाला जवळून बघायचं ठरवलं. मी पुढे गेलो आणि झाडाखाली पोहोचलो.
अचानक एक वेगळंच गारवा जाणवला. म्हणजे वातावरणात गारवा होताच पण त्या झाडाखाली मात्र गोठवून टाकणारी थंडी जाणवू लागली. मी हा विचार करत असतानाच मला असं वाटलं की माझ्या शेजारी कोणी तरी उभं आहे. मी वळून बघितलं, पण काही दिसलं नाही. तरीही काहीतरी विचित्र जाणवत होतं. अर्जुन लांब उभा होता, त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मी परत त्याला हाक मारली, पण माझा आवाज त्याच्या पर्यंत पोहोचण्या ऐवजी त्याच भागात जणू विरून गेला.. पुढच्या क्षणी मला हळदीचा सुंगंध येऊ लागला. नुसती हळद नाही पण सतत वाटत होतं की लग्नाच्या आधी जशी नवऱ्याला किंवा नवरीला संपूर्ण अंगाला हळद लावतात ना तश्या ओल्या हळदीचा सुंगंध येत होता. मी सहज वर पाहिलं तर पानांची सळसळ ऐकू आली. पण जाणवलं की काही वेळापूर्वी वाहत असलेला वारा आता पूर्णपणे थांबलाय. अचानक मला माझ्या मागून हसण्याचा आवाज आला – एक स्त्रीचा घाणेरडा, भयावह आवाज.
मी वळून पाहण्याचा प्रयत्न केला, पण माझं शरीर गोठल्यासारखं झालं. हळूहळू काना जवळ आवाज येऊ लागला. माझ्या कानाशी कुणीतरी कुजबुजत होतं, “कशाला आलास इथे? परत जायचं नाही आता!”. तो आवाज ऐकून मी तिथून जायला निघणार तेवढ्यात मला जाणवलं की माझे पाय जमिनीला टेकले नाहीयेत तर मी काही फूट हवेत तरंगत आहे. मला असे पाहून अर्जुन घाबरून ओरडत जवळ आला, त्यानं माझा हात धरून ओढत तिथून पळ काढला. आम्ही दोघं श्वास लागेपर्यंत धावत होतो. गावात पोचल्यावर कळलं की आम्ही जवळपास एक तास त्या झाडाजवळ थांबलो होतो, पण आम्हाला ते पाचच मिनिटांचं वाटलं होतं. अर्जुननं गावातल्यांना सांगितलं, तर ते मला नाही पण अर्जुन ला खूप बोलले. कारण तो लहानाचा मोठा त्याच गावात झाला होता. मी शाळेत शिकत असतानाच खेड सोडून शहरात राहायला गेलो होतो. त्याची चूक नव्हती तरीही तो काहीच बोलला नाही. मी ही प्रसंगाच गांभीर्य ओळखून गप्प राहिलो.
त्या रात्रीनंतर मला चांगला आठवडाभर झोप लागली नाही. तिथं नक्की काय आहे हे जाणून घेण्याच्या फंदात मी पडलो नाही. अजूनही त्या झाडाखालचं हसणं, तो कुजबुजणारा आवाज आणि त्या सुगंधाची आठवण अंगावर काटा आणते. यावरून एक गोष्ट कळली की जिथं अशा गोष्टींचं अस्तित्व आहे, तिथं उगीच धाडस करून आपला अतिशहाणपणा दाखवायचा नसतो..!