अनुभव – प्रकाश

बी.एस.सी.द्वितीय वर्षात शिकत असतानाची म्हणजे साधारण १९९६ मध्ये माझ्यासोबत घडलेली घटना..

माझ्या प्रिय आजीचं निधन झाल्याने माझे B. Sc. II year चे माझे प्रॅक्टिकल बुक अपूर्ण होते आणि ते पूर्ण करणे आवश्यक होते. माझ्या वर्गात राजन कांबळे नावाचा अतिशय हुशार आणि मनमिळाऊ स्वभावाचा विद्यार्थी होता. त्याचे प्रॅक्टिकल बुक पूर्ण होते. बायोलॉजीचे बोपुलवार सर म्हणाले, ” संजय, कांबळेकडून प्रॅक्टिकल बुक घे आणि तुझे प्रॅक्टिकल बुक पूर्ण कर”. मी सुद्धा त्यांचा विचार अमलात आणायचा असे ठरविले.

#अतकुर# छोटे गाव.. धर्माबाद येथून साधारण सात ते आठ किलोमीटर. हे राजनचे गाव होते. त्याच्याकडून प्रॅक्टिकल बुक आणण्याचा निश्चय केला. शुभस्य शिघ्रम असा विचार केला आणि लगेच त्याच्या गावाकडे निघालो. साधारण साडेपाच वाजले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. दिवस अजूनही चांगलाच जोरात होता. अर्थात उन्हाळ्यात दिवस उशिरा मावळतो हे लक्षात होते. दोन तासात परत येऊ शकतो असा विचार केला आणि मी निघालो. तरीही शंकेच्या स्वरात एक मित्र पुटपुटला. ‘आता कुठे जातोस’ ? उद्या सकाळी जा. मी म्हणालो, नको. आताच जातो. प्रॅक्टिकल बुक पूर्ण करणे आवश्यक आहे. फक्त तीन दिवस हाताशी आहेत. जास्त विचार न करता सायकलवर टांग टाकली आणि अतकुरच्या दिशेने मी निघालो.

अतकुर गाव अगदी खेडेगाव. अर्थात यापूर्वी मी कधीही “अतकुर” या गावी गेलेलो नव्हतो त्यामुळे त्या गावाची किंवा रस्त्याची मला काहीही माहिती नव्हती. लवकरच लक्षात आले की रस्ता सुनसान आणि तेवढाच खडतर आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे *रस्त्यातील खड्डे की खड्ड्यातील रस्ता* शोधत माझी सायकल निघाली होती. खेडेगाव असल्याने रस्ता अगदी निर्मनुष्य होता. सायकल म्हणत होती जाऊ दे जोरात. रस्त्याच्या कडेने झाडी असल्याने भुरू भूरू वारा वाहत होता. मोकळा रस्ता असल्याने मी छान रोमँटिक गाणी म्हणत होतो. अचानकच कधीतरी वाऱ्याची हलकीशी झुळूक येत होती आणि अंगावर छानसा शहारा उमटून जात असे. उन्हाळा असला तरी वातावरण छान मोहक वाटत होते. मी विचार केला, जर मी या वेगाने गेलो तर निश्चितच अंधार पडण्यापूर्वी परत धर्माबाद येथे येऊ सहज शकतो.

पण हाय रे दुर्दैव ???? अचानकच सूर्य महाराज अस्तंगत होण्याची चिन्हं दाखवत होते. दिवसाचा उजेड कमी होत होता आणि स्वतःची सावली क्षीण होत होती. अर्थात सूर्य महाराज लवकरच बुडणार याची खात्री झाली होती. याचाच विचार करीत असताना सहजच माझी नजर समोर गेली आणि पहातो तर काय? समोर एक आकृती?!! रस्त्याजवळ असलेल्या झाडाजवळ उभी… हातात टिफीनचा डब्बा.. बहुधा बाईच. अंदाज खरा निघाला. बाईच. दिसायला गोरी गोमटी. नाजूक आणि आकर्षक बांधा. केसात माळलेला गजरा. कोरीव भुवया. लालचुटुक ओठ आणि कुणाच्याही अंतरंगाचा ठाव घेणारी डोळ्यांची जोडगोळी. पण एवढी सुंदर बाई!!! अशा अवेळी आणि सामसूम रस्त्यावर कशाला उभी असेल? तिच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करत मी पुढे निघालो. तोच मागून मंजुळ आवाज आला. भाऊ, मला येऊ द्या.. आवाजात खूपच गोडवा होते. तरीही नकोच हे बाईचे झेंगट म्हणून मी कानाडोळा करीत होतो. तेव्हा पुन्हा एकदा आवाज आला. अहो भाऊ, मला येऊ द्या. आता मात्र मला कळेना. एवढ्या संध्याकाळी एक घरंदाज आणि आकर्षक असलेली बाई अपरिचित माणसाला बोलते काय? आणि बिनधास्त येऊ द्या असे म्हणते काय? मी सायकल थांबवली.

एव्हाना ती माझ्याकडे येत आहे अशी चाहूल लागली. जवळ येताच मी तिला स्त्री दाक्षिण्य राखून अदबीने म्हणालो, कुठे जायचे आहे?. अतकुर… तिने छान मंजुळ आवाजात सांगितले. बोलताना तिची दंतपंक्ती चमकत होती आणि माझ्या मनाला मोहून टाकत होती. ती म्हणाली, “मला अतकुर येथे जायचे आहे”. “मी मागे बसते” असे म्हणत ती एव्हाना सायकलच्या मागच्या सिटवर बसली. तिच्या त्या चपळ क्रियेकडे मी अनिमिष नजरेने पाहिले. एकाच क्षणी तिची आणि तिची माझी खऱ्या अर्थाने नजरानजर झाली. तरीही जास्त मोहात न पडता मी सायकल सुरू केली पण सायकल सुरू करण्यापूर्वी तिला एक सूचना केली की, तिने तिचा थांबा येईपर्यंत एकही शब्द बोलायचा नाही..

एकीकडे सायकल सुरू आणि एकीकडे मनात अगणित विचार सुरू. अशा परिस्थितीत अशा सुंदर आणि मनमोहक स्त्री बरोबर कुणी पाहिले तर काय होईल? हे गाव पूर्वी कधीही आपण पाहिले नाही. या रस्त्यावर कुणीही आपल्याला ओळखत नाही. या बाईचाच काहीतरी डाव नसेल कशावरून? असे अनेक संभ्रम मनात निर्माण होत होते. कदाचित हिची एखादी टोळी असेल आणि आपल्यालाच लुटून नेतील .पण माझ्यासारख्या विद्यार्थ्याजवळ लुटण्यासारखे काहीच नव्हते. म्हणजे दहा रुपये सुद्धा नव्हते. आपल्याजवळ काहीच मिळाले नाही म्हणून रागाने हिचे साथीदार एखाद-दोन चापटा मारतील आणि आपल्याला सोडून देतील असाही एक क्षुद्र विचार त्या क्षणी येऊन गेला. “मन चिंती ते वैरी न चिंती” या विचाराने स्वतःशीच माझे मनाचे खेळ चालले होते. अशाच विचारात साधारण एक सव्वा तास गेला. या विचारांच्या साखळीत असताना पुन्हा तोच मंजुळ आवाज कानी आला. “भाऊ थांबा”.. मला उतरायचे आहे.

मी सायकल थांबवली. तिने अलगद खाली उडी मारली हे मला जाणवले. मी मात्र मागे पाहण्याचा मोह टाळला. आजूबाजूला तिच्या व्यतिरिक्त यावेळी कुणीही नाही याची मला खात्री होती. कातरवेळ होती. अर्थात तेवढा अंधार गडद पडला नसल्याने ती कुठे जाणार? कशी जाणार? किंवा तिचे घर कुठे आहे? हे विचारण्याचे अगाऊ धाडस केले नाही आणि मला त्याची गरजही वाटली नाही. मी जास्त विचार न करता सायकल घेऊन पुढे निघालो. साधारण सात वाजले होते. एक तर रस्ता खराब आणि त्यात सायकलवर ही #स्वरूप सुंदरी त्यामुळे मित्राच्या गावी जाण्यास मला अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागला.

मी कांबळे यांच्या घरी पोचलो. कांबळे घरी नव्हताच. शेतात गेला होता. त्याचा छोटा भाऊ घरी होता. त्याला थोडक्यात प्रॅक्टिकल बुक बाबत सांगितलं. काहीही अडचण न सांगता त्याने प्रॅक्टिकल बुक दिले. थोडेशे जुजबी बोलणे झाले आणि लगेच मी परतीच्या मार्गाला निघालो. कांबळेच्या भावाला काहीतरी मला सांगायचे आहे असे उगीचच वाटले….पण तसा भास झाला असे समजून मी त्याकडे कानाडोळा केला. त्याचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

मी सायकलवर बसलो आणि सायकल सुरू केली. अगदी पंधरा वीस मिनिटात मी त्याच जागी आलो ज्या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी मी त्या बाईला सोडले होते. पण आता माझी दिशा बदलली होती. त्या बाईला मी उजवीकडे सोडले होते आणि आता मी डावीकडून जात होतो. क्षणभरासाठी निखळ सौंदर्य लाभलेल्या त्या बाईचा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला अगदी क्षणभरच…..पण तो विचार मी लागलीच झटकून टाकला. आणि आणि .अचानक मागून तोच परिचित गोड आवाज आला. भाऊ, मला येऊ द्या. त्या मंजुळ स्वरांनी माझ्यावर #मोहिनी टाकली होती आणि त्यामुळेच की काय मला भास झाला असे वाटले. परंतु अगदी कानाच्या जवळ पुन्हा तोच मधाळ स्वर. भाऊ येऊ का?? आता मात्र माझी भीतीने गाळण उडाली. कोणत्याही पत्थरदिल माणसाच्या काळजाचे पाणी पाणी करणारा क्षण. माझी अवस्था फारच घाबरलेली. हृदयाचे ठोके सशाच्या हृदयापेक्षा जोरात पडत होते पण चेहऱ्यावर उसने अवसान आणून मी स्वतःला सावरत होतो. मुख्य म्हणजे याही वेळी तिच्या हातात टिफीन डबा होता त्यामुळे नशिबात काहीतरी वेगळेच वाढून ठेवले आहे अशी शंका येत होती.

मला हे जाणवले की काहीतरी दैवी अथवा दानवी शक्ती आपल्यासमोर उभी आहे याची मला खात्री झाली होती. मला हीही पुरेपूर जाणीव झाली होती की, आता फक्त “वेळ” ठरविणार होती की माझा *काळ* आला की नाही. एव्हाना ती मागच्यापेक्षा जास्त सुंदर आणि मनमोहक दिसत आहे असा विचार त्या क्षणीही माझ्या मनात येऊन गेला आणि तसा विचार माझ्या मनात कसा काय आला? असे वाटून त्या भयंकर प्रसंगी सुध्दा मनात हसू आले. पण “वास्तव कधी कधी कल्पनेपेक्षाही भयंकर असते” हे त्या क्षणी मला मनोमन पटले; कारण काही क्षणापूर्वी अतिशय सुंदर वाटणारी स्त्री? मला आता फारच भयंकर आणि भीतीदायक वाटू लागली. त्या क्षणी आजुबाजुच्या सर्व गोष्टींचा एका क्षणासाठी मला विसर पडला होता. आजूबाजूला काय घडत आहे असा विचार करीत असताना डोके जड पडत आहे असे वाटत होते. दोन सेकंदातच मी भानावर आलो. बाईने छान हसतच पुन्हा विचारले भाऊ, मला येऊ द्या. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. किंबहुना मला दुसरा पर्यायच नव्हता. एक अतर्क्य शक्ती माझ्याशी बोलत होती हे मला कळत होते. या शक्तीचे आपण जर ऐकले नाही तर आपल्या जीवाचे बरे वाईट आत्ताच होणार हे मला पक्के माहित झाले होते. त्यामुळे मी तिला नाही असे म्हणू शकलो नाही.

ती अलगद माझ्या मागे बसली आणि त्या अंधार्‍या रात्री निर्मनुष्य रस्त्यावर सायकलवर मी भीतीयुक्त अंतःकरणाने निघालो. जीवाची भीती आणि विचारांचे काहूर. मनामध्ये नुसता कल्लोळ माजला होता. ज्या बाईला आपण थोड्या वेळापूर्वी सोडतो काय? तीच बाई पुन्हा आपल्याला त्याच जागी परंतु विरुद्ध दिशेला दिसते काय? आणि पुन्हा सायकलवर ‘मला येऊ द्या’ म्हणते काय? तेही टिफीन सह. मला चक्रावून टाकणारे हे सगळे प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्यासमोर उभे राहत होते. आज आपल्याबाबत काहीतरी अघटित घडणार आहे असे वाटत होते. मनामध्ये देवाचा धावा चालू केला होता. पण एक मात्र खरे की एवढ्या गहन आणि कठीण प्रसंगात सुध्दा मी पूर्ण साहस गमावले नव्हते. देवावर अविचल श्रध्दा असल्याने यातूनही काहीतरी मार्ग निघेल असे मनोमन वाटत होते. लहानपणापासून पोथ्या पुराणं वाचून मन सात्विक आणि खंबीर बनलेले होते आणि त्यामुळेच प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याचे मी ठरविले. अशा विचारात अगदी दहा पंधरा मिनिटेच गेली असतील इतक्यात माझ्या मागून एका गाडीचा प्रकाश आमच्या दोघांवर पडला. गाडीवर लाईट पडल्यापडल्या माझ्यामागे बसलेली ती बाई अचानक माझ्या डाव्या बाजूने पुढे पळत गेली आणि धाडकन कुणीतरी पाण्यात उडी मारली आहे असा मला आवाज आला. मला काही सुचेनासे झाले. सगळी मती गुंग झाली होती. अचानक मागून

आलेली टू व्हीलर माझ्या सायकल समोर येऊन थांबली. अंधारात एखादा प्रकाश चमकून गेल्यानंतर तो अंधार आपल्याला जसा जास्तच काळोखमय वाटतो तसेच तो अंधार मला जास्तच अंधारलेला वाटला. त्या बाईचा विचार आणि अचानक आलेली ही टू व्हीलर!!!. सगळ्या अनपेक्षित घटनांनी माझे डोके भणाणून गेले. मला काही कळण्याच्या आत त्या टू व्हीलरवर बसलेल्या एका व्यक्तीने माझ्या कानफटीत मारली आणि त्याच क्षणी मी बेहोश झालो.

काही वेळातच डोळ्यावर पाण्याचा शिडकावा टाकल्याने मी डोळे उघडले आणि पाहतो तर काय!!! समोर साक्षात माझा मित्र #राजन कांबळे आणि त्याच्या बरोबर अजून दुसरी व्यक्ती!! माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. राजन काहीतरी समजून गेला; पण काही बोलला नाही. त्याने स्वतःच सायकल झाडाला टेकून ठेवली आणि मला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. राजनच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेत याची मला जाणीव झाली होती.. आणि माझ्या डोक्यातही सारखा त्या बाईंचा विचार… ती बाई कुठे गेली? ती बाई पुढे का पळाली? त्या बाईचा नेमका उद्देश काय होता? अशा विचारतंद्रीत आम्ही राजनच्या घरी पोहोचलो. कांबळेच्या घरी येईपर्यंत एकही शब्द आम्ही तिघेही एकमेकांना बोललो नव्हतो, पण मी मात्र उत्सुकता आणि भीतीयुक्त दृष्टीने हा सारा प्रसंग समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो.

राजनच्या घरी पोहोचलो. राजनने घरातील लोकांना चहापाणी करण्यास सांगितले. राजन सारी परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत होता हे मला जाणवत होते. राजनने बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, तू माझ्या घरून निघाला आणि मी नेमका घरी आलो. गाडी लावणार होतोच, इतक्यात भाऊ म्हणाला की, तुझा मित्र आत्ताच प्रॅक्टिकल बुक घेऊन गेला. त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत तशीच सुरू असलेली गाडी मी तुला गाठण्यासाठी दामटली. मला उगीचच काहीतरी जाणीव झाली की, कदाचित तुझ्या बाबतीत काहीतरी अघटित होऊ शकते म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता या मित्राबरोबर तुझ्या पाठीमागे आलो. त्याने त्याच्या भावाला मला एकट्याला त्या वाटेने का जाऊ दिले? याबद्दल तीव्र स्वरात संताप व्यक्त केला. तेव्हा त्याच्या भावाने त्याला सांगितले की, मला विनाकारण त्यांना घाबरून सोडायचे नव्हते….

डोक्यात शंका निर्माण करून उगीचच भीती निर्माण करण्याची मला गरज वाटली नव्हती. म्हणून मी त्यांना काही पूर्वसूचना दिली नव्हती. त्याचवेळी मी मित्राला म्हणालो, अरे, “बहुतेक तुझ्या भावाला काहीतरी सांगायचे होते; हे मी ताडले होते परंतु त्याकडे मीच दुर्लक्ष केले”. त्यामुळे त्यात तुझ्या भावाचा काहीही दोष नाही असे म्हणाल्यावर तो शांत झाला. काही वेळाने त्याने मला विचारले. काही अनपेक्षित अथवा विशिष्ट घटना तुझ्याबाबत घडली का? मी त्याला हो म्हणालो आणि धर्माबादपासून सुरू झालेली सर्व घटना त्याला तपशिलासह सांगितली. सारी घटना घरातील सर्व सदस्य कान देऊन ऐकत होते. प्रत्येक प्रसंगाला त्यांच्या अंगावर काटे उभे राहत होते. सारा घटनाक्रम सांगितल्यावर तो म्हणाला..मित्रा, तुझे आयुष्य बलवत्तर होते; म्हणूनच तू आज वाचला. नाहीतर आज तुझी खैर नव्हती.

तो जे सांगत होता यावर माझा विश्वास बसत होता परंतु या गोष्टीचा नेमका माझ्याशी असलेला कार्यकारणभाव अजूनही कळला नव्हता. त्याला म्हटले, परंतु हे माझ्या बाबतीतच का? तेव्हा तो म्हणाला, धर्माबाद येथे एक सूतगिरणी होती. त्या सूतगिरणीमध्ये कामगार असलेल्या एका तरुण मुलामुलीचे प्रेम जमले. परंतु काही कारणास्तव त्या दोघांचे लग्न होऊ शकले नाही आणि त्यामुळे निराश होऊन त्या मुलीने एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तू जिथे बेहोश पडला होतास ना!!. तिथून थोड्याच अंतरावर ती विहीर आहे. आतापर्यंत तीन चार मुले त्या विहिरीत मरून पडली आहेत आणि मुख्य म्हणजे ती मुले या गावातील नव्हती.

त्याने असे म्हणत मला घट्ट मिठी मारली. मी शहारून गेलो. तो पुढे म्हणाला; तू फार नशीबवान आहेस म्हणूनच अशा कठीण प्रसंगात तू वाचला असे म्हणत त्याने माझ्यासाठी देवाचे आभार मानले आणि मलाही त्याच्या घरातील देवघरात जाऊन देवांचे दर्शन घेण्यास सांगितले.

मित्रांनो, त्यावेळी मला खात्री झाली की जगामध्ये जर देव असेल तर दानव सुद्धा असतात. दैवी शक्ती असेल तर असुरी शक्ती सुद्धा असते याची साक्ष त्याक्षणी मला पटली होती. मी मनोमन त्या देवदूत बनलेल्या माझ्या मित्राचे, देवाचे आणि कुठल्याही प्रसंगात तोल ढळू न देण्याचे संस्कार देणाऱ्या आई-वडिलांचे आभार मानले आणि असा प्रसंग माझ्या बाबतीत पुन्हा कधीही न घडो अशी देवाकडे प्रार्थना केली.

*ताजा कलम*– या गोष्टीवर प्रत्येकाने विश्वास ठेवावा अशी माझी कुठलीही अपेक्षा नाही. परंतु अपरिचित गावात, अपरिचित रस्त्यावर आणि अपरिचित ठिकाणी एकटे जाताना तुम्ही नेहमीच काळजी घ्यावी ही अपेक्षा नक्कीच ठेवतो.

Leave a Reply